Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं.
सत्ता हातात असताना जमिनीवर पाय ठेऊन वागावं
सत्ता हातात असताना जमिनीवर पाय ठेऊन वागायचे असते. पण अलिकडच्या काळात सत्ता ज्यांच्या हातात त्यांच्याकडून चुकीची भाषा केली जात आहे. हे राजकीय नेत्यांचे खरे काम नाही.
शिवसेनेत दोन गट पडले ही गोष्ट खरी आहे. पण जो कडवा शिवसैनिक आहे, जो फिल्डवर काम करतो तो कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे शरद पवार म्हणाले. याला कोल्हापूर देखील अपवाद नाही. काही आमदार खासदार इकडून तिकडे गेले असतील. पण उद्या येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या भावना लक्षात येतील असेही शरद पवार म्हणाले.
राज्यपालांवर आम्ही पण सगळे नाखूष
राज्यपाल इथं नाखूष असतील तर आम्ही पण सगळे त्यांच्याबद्दल नाखूष आहोत. पहिले असे राज्यपाल आहेत की सतत त्यांच्यावर टीका होत आहे. जनता त्यांच्यावर टीका करत आहे. महााषट्रात एक चांगली परंपरा आहे. राज्यात अनेक चांगले राज्यपाल आले. जे जे राज्यपाल महाराष्ट्रात आले पक्ष कोणताही असो पण राज्याच्या हिताच्या गोष्टी मांडल्या. सध्याचे राज्यपाल अस आहेत की त्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. सतत लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. ते चुकीची वक्तव्य करत आहेत. त्यामुळं जनतेला त्यांच्याबद्दलची नापसंती द्यावी लागते असे शरद पवार म्हणाले. राज्यपाल हे महत्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. पण ती सध्याच्या राज्यपालांकडून राखली जात नाही.
राहुल गांधींच्या पदयात्रेचा फायदा होईल
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या संदर्भात सत्ताधारी पक्षाने टीका टिंगलटवाळी केली. भारत जोडो यात्रा ज्यावेळी सुरु झाली त्यावेळी देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली. परंतू राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पक्षापुरती राहिली नाही. सर्वसामान्य लोक, विविध पक्षाचे लोक त्यामध्ये सामील झाल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी देखील भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचे पवार म्हणाले. राहुल गांधींच्या पदयात्रेचा फायदा होईल असे पवार म्हणाले.
